Giving a shoulder to the deceased
Giving a shoulder to the deceased
मृत व्यक्ती ला खांदा देणे
मृत व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे काम आहे असे सुविचार वजा वाक्य मी त्या दिवशी ऐकले. तो दिवस तसा मला जरा गोंधळवून टाकणारच होता, आमच्या इमारतीत जाधव काकांचे मयत झाले होते. सर्व जण इमारतीच्या खाली जमा झाले. मी ही त्या गर्दीत समावलो होतो. वयस्करांना खुर्चीवर बसवणे आणि कुणी विचारले की "काल रात्री पर्यन्त ठीक होते आज सकाळी असं कसं काय झालं कुणास ठाऊक" हे वाक्य सांगण्याचे मी करत होतो. आता याला काम करत होतो असं तर म्हणू शकत नाही. त्यातील एक गृहस्थ विचारू लागले खांदा कोण देणार आहे बहुदा ते जाधव काकांचे नातेवाईक असावेत. त्यावर पाच सहा जण समोर आले मी विचार करू लागलो..... यातल्या एकालाही मी गेल्या चार पाच महिन्यात पहिले न्हवते.
जाधव काका गेल्या चार पाच महिन्या पासून आजारी होते, आमच्या समोरच्या घरात ते राहायचे. त्यांना भेटायला कोण येत कोण नाही हे माझ्याशिवाय जास्त चांगलं अजून कुणाला माहित असणार, असो!
मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र असले तरी तुम्हाला त्याचे पुण्य मीळणार, आधी जर कोणते पाप केले नसेल तरच! मृत व्यक्तीला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. मृत व्यक्तीला खांदा देण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असताना तिला मदतीचा हात द्या त्याने जास्त पुण्य लाभेल असे मला तरी वाटते. जिवंत पणी त्यांच्या पायाला हात लावून आपण आशीर्वाद घेतला, त्याच व्यक्तीच्या मृत देहाला हात लावताना काही जण घाबरतात. ज्या व्यक्ती च्या सहवासात आपण राहिलो त्या व्यक्तीची भीती का वाटावी हा प्रश्न विचार करण्या सारखा आहे.
खरं तर माणूस गेल्यावर धावपळ करण्या पेक्षा तो जिवंत असताना त्याच्या साठी धावपळ केली जावी असे मला वाटते. मी मोठा की तू मोठा ह्या शर्यतीत माणुसकीच हरवली जाते. हाच तो क्षण असतो जेव्हा लांबचे जवळचे सर्व नातलग एकत्र येतात. प्रेत्येकाच्या मनात वेगवेगळे विचार चालू असतात. मृत्यू ची बातमी समजताच जसे सगळे धावून येतात, तसे जिवंत व्यक्तीच्या पडत्या वेळेस येऊन त्याला सावरण्यासाठी सर्व जण धावून का येत नाहीत. प्रत्येक वेळेस सावरण्यासाठी पैसाच गरजेचा असतो असे नाही ना! कधी कधी प्रेमाचे दोन शब्द, आपुलकीचे सल्ले ही फार महत्वाचे असतात असे मलातरी वाटते.
ह्या धावपळीच्या जगात सगळ्यांना सगळं कसं पटापट झालं पाहिजे असं वाटतं, मृत व्यक्ती ला पाहायला आलेले बरेचशे त्याला दहन करण्याच्या प्रक्रियेसाठी धावपळ करतात. त्यांना परत घरी जायला उशीर होणार असतो ना! अरे तुम्ही जरी नाही आलात तरी मृतादेह दहन करायचे राहून जाणार आहे का? अरे ज्या व्यक्तीला शेवटचे पाहायला आलात त्याचा चेहरा एकदा पहा तरी, त्याच्या सोबत घालवलेले चांगले दिवस आठवा..... पण नाही ईथे वेळ कुणाला कारण आता ती व्यक्ती व्यक्ती नाही राहिली, तिची तर बॉडी झाली आहे, त्या बॉडीचे दहन लवकरात लवकर केले पाहिजे.
मृत्यू तर नियती आहे. कितीही टाळला तरी तो येणारच आहे.
मृत्यु तर धर्मच आहे शरीराचा.
जन्म आणि मृत्यू कोणत्याही सजीवाच्या आयुष्यरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत.
मृत्यू एक अटळ सत्य जे कुणीही नाकारू शकत नाही. पण माणूस जो पर्यन्त जिवंत आहे, बोलतोय, चालतोय तो पर्यंत त्याला मदतीचा हात नक्की द्या. खांदे दिल्या पेक्षाही जास्त पुण्य मिळेल.
लेखन :- मनिष महादेव जोशी
Comments
Post a Comment