Nature
Nature
निसर्ग
निसर्ग आपल्या जीवनातील अविभाज्य घटक. निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे.
निसर्ग शब्द लॅटिन शब्द नतुरा पासून निर्माण झाला आहे. निसर्गामध्ये हवा, पाणी, वृक्ष, पशु, पक्षी, माणसे यांचा समावेश होतो.
निसर्ग आपल्याला पुष्कळ काही देतो पण मनुष्य प्राण्याच्या ओरबाडून घेण्याच्या वृत्ती मुळे सामान्यत:हा निसर्गही बदलत चालल्याचे दिसून येत आहे. निसर्ग आपल्याला पूर्ण पणे कळलेला नाही किंबहुना आपण तो कधी समजून घेतलाही नाही. अश्यावेळेस निसर्गाने रौद्र रूप धारण केले की आपण म्हणतो निसर्गाने मानवला अद्दल घडविण्या साठीच हे रूप घेतले आहे. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाचा फटका साक्षात निसर्गालाही बसत असतो. पूर, वादळे ह्यामुळे मनुष्या प्रमाणे झाडे, अन्य प्राणी, पशु, पक्षी जमीन ह्यांचेही नुकसान होते. बऱ्याच अंशी ह्याला मनुष्य प्राण्याला जबाबदार ठरवले तर ते काही चुकीचे ठरणार नाही.
निसर्गाचे स्वतःचे अशे अनंत नियम आहेत. त्या सर्व निसर्ग नियमांचा राजा एकाच घोषवाक्यावर काम करत असेल कदाचित ते म्हणजे "क्रिया तशी प्रतिक्रिया".
निसर्गात कोणतीही क्रिया केली की त्याची प्रतिक्रिया ही होत असतेच. निसर्ग चांगल्या क्रियेला चांगली प्रतिक्रिया तर वाईट क्रियेला वाईट प्रतिक्रिया देत असतो.
तुम्ही एखादे बी पेरले तर कालांतराने त्याचे रोपात, नंतर वृक्षात रूपांतर होते. हळू हळू तो वृक्ष मोठा होऊन फळे आणि सावली देऊ लागतो. एखादे झाड लावणे बाजूलाच राहिले मनुष्यप्राणी स्वतःच्या स्वार्था पाई आहेत ती झाडे ही तोडून टाकून सिमेंट काँक्रेट चा निसर्ग बनवत चालला आहे.
निसर्गाचा समतोल ढासळत चालल्याने म्हणा किंवा निसर्गाच्या सहनशीलतेच्या पलीकडले जेव्हा जाते, तेंव्हा निसर्ग प्रलयाच्या किंवा महामारीच्या रूपाने ते संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या वेळेस निसर्गाला दोष देण्यापेक्षा मनुष्य प्राणी म्हणून आपण नेमके कुठे चुकलो ह्याचा विचार करा. तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतील.
अलीकडे आपण अनुभवतो आहोत की जगभर पर्यावरणाच्या हानीमुळे ऋतुचक्र पूर्ण पणे बदलत चालले आहे. पाऊस तर त्याच्या मनाला वाट्टेल तसा पडतो, कधी धो धो पडतो तर कधी पडतच नाही. श्रावतील रिमझिम पाऊस तर दिसेनासाच झालाय.
मनुष्य प्राणी निसर्गाला गृहीत धरून चालला आहे. परिणामी जंगल तोड, डोंगर भुई सपाट करणे, वाढते शहरीकरण यासारखे वाढते अत्याचार केल्यामुळे दीर्घकालीन पर्यावरणीय बदल होऊन सृष्टीचे तापमान वाढत चालले आहे. त्यातून आर्टिक आणि अंटार्टिका येथील बर्फाचे प्रमाण कमी होऊन समुद्राची पातळी वाढत चालली आहे.
हे सर्व असेच चालू राहिले तर सृष्टीवरील प्राणी जीवन, वनस्पती जीवन आणि मानवी जीवन या सर्वांवर त्याचे भयानक परिणाम वाढत्या प्रमाणात दिसून येतील आणि सर्वच सजीव प्राण्यांच्या जीवनावरील धोका वाढत जाईल.
लेखन :- मनिष महादेव जोशी
Comments
Post a Comment