History
History
इतिहास
इतिहास म्हणजे भूतकाळात काय घडले ह्याची सुसंगत मांडणी. 'इति+ह+आस' अशी ह्या शब्दाची उत्पत्ती. दुरून पाहिलं तर इतिहास हा काजव्या प्रमाणे वाटू लागतो, पण जस जसे आपण ह्या इतिहासाच्या जवळ जाऊ पाहतो तस तसा तो सूर्या प्रमाणे तेजस्वी वाटू लागतो.
इतिहास आपल्याला घडवतो आणि वाचवातोही. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. त्यातील कोणत्याही कालखंडाचा अभ्यास करणे म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूचा सखोल अभ्यास करणे.
आता हा अभ्यास कसा करायचा तर भूतकाळातील घटनांची सुसंगत माहिती जमा करायची. प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक अश्या कालखंडाला समजून घेऊन अभ्यास करायचा. त्यातून आपल्याला पूर्वी माणसं कशी राहत होती. कोणते अन्न खात होती. कोणत्या प्रकारची वस्त्रे न्हेसत होती. त्यांनी स्वतःमध्ये आणि समाजामध्ये कश्या प्रकारे प्रगती केली. त्यांनी कोणत्या चुका केल्या. त्यांची कशी फसवणूक झाली अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला इतिहास देतो.
ही उत्तरे मिळवण्यासाठी आपल्याला भौतिक, लिखित आणि मौखिक साधनाचा वापर करावा लागेल. आता ही सर्व साधन आपल्या आसपासच असतात फक्त आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो, वाचनाची प्रबळ ईच्छा शक्ती लागते आणि शांत चित्ताने ऐकण्याचे बळ असावे लागते.
भौतिक साधनामध्ये वस्तू आणि वास्तूंचा समावेश होत असतो. भौतिक साधनांना पुरातत्वीय साधने या नावाने देखील संबोधले जाते.भौतिक साधनांमध्ये हस्तांतर करून कोणत्याही प्रकारचे बदल घडवून आणता येत नाही, आणि हेच याचे मुख्य वैशिष्ट्य असते. भौतिक साधनांमध्ये उत्खननात सापडलेले अवशेष, नानी, मोठ मोठी स्मारके, मुर्त्या, वास्तू, वास्तूंवर आढळलेल्या हस्तकला, आलेख, आलेखांमध्ये स्तंभालेख, गुहेत सापडलेले लेख म्हणजेच गुहालेख, मंदिरे, मूर्ती, धातूंवर आढळलेले लेख म्हणजेच धातूलेख यांचा समावेश असू शकतो. ज्यात आपण कोणताही बदल करू शकत नाही.
लिखित साधने म्हणजे अक्षर अथवा लिहून जतन केलेले साधन. भारतात सापडलेली लिखित साधने ही साधारणतः संस्कृत भाषेतील, मोडी लिपितील असतात. लिखित साधनांमध्ये वेद, ग्रंथ, काव्यकथा, यांचा समावेश असू शकतो. आता ही साधने काळानुसार, परिस्थिती नुसार, वैचारिक पातळी नुसार बदलत जातात हे तितकेच खरे. त्यातून आपल्याला वाचून जे काही समजले ते आपले साधन.
मौखिक साधने ही संवादाच्या माध्यमातून विस्तारत असतात, ज्यात कालांतराने बदल होण्याची दाट शक्यता असते. लहानपणा पासून आपण आजी आजोबानी सांगितलेल्या गोष्टी ऐकत आलोच आहोत, त्यामुळे मौखिक साधनांवर पूर्णतः विश्वास ठेवता येत नाही. मौखिक साधने साधारणतः कविता, पोवाडे, अभंग, या स्वरूपात आढळतात. ह्यात प्रामुख्याने प्रत्येकाने स्वतःचे मांडलेले विचार असतात, प्रत्येकाची आकलन क्षमता, विचारीक पातळी ह्यावर हे आधारित असते.
इतिहासाकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकण्याचा प्रयत्न करा. कारण भूतकाळातील गोष्टीच पुढचे भविष्य घडवीत असतात.
लेखन :- मनिष महादेव जोशी
Comments
Post a Comment